मुंबई : मुंबई तसेच राज्यातील शहरात केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्त्व अमुलाग्र बदलावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री, मनपा आयुक्तांसोबत बैठकीत सूचना केल्या. यावेळी मुंबईतील रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, उद्याने, मनोरंजन मैदाने, मंडई, शालेय परिसर, आरोग्य, पाणी आणि विविध नागरी सेवा सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी प्रत्येकाने एक संघ म्हणून काम करावे असे निर्देशीत केले.
मुंबईत असलेल्या विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मुंबई तसेच राज्यातील शहरात केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्त्व अमुलाग्र बदलावे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले तसेच शहरातील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईचे सौंदर्यीकरण, आकर्षक पदपथ, बसथांबे याबाबत तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती घेतली. तसेच मुंबईतील व्हिज्युअल प्रदूषणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत बेकायदेशीर होर्डिंग्जबाबत सर्व राजकीय पक्ष संवेदनशील राहतील असे आश्वासन दिले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, आमदार अनिल परब, यांची उपस्थिती होती. यावेळी मुंबई महानगरपालिकेतील विविध प्रभागांतील विकासकामांची आढावा बैठक पार पडली.