Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुलांना बंगल्यात डांबून ठेवल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

मुलांना बंगल्यात डांबून ठेवल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या आरोपाची तक्रार मागे घेण्यात दिलासा मिळाला असतानाच आता एक नवं संकट उभं राहिलं आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करूणा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी मुलांना चित्रकूट बंगल्यात मागील तीन महिन्यांपासून डांबून ठेवलं असल्याचा गंभीर आरोप करुणा यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे.

करुणा यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे –
“माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्या दोन मुलांना जबरदस्ती आपल्या बंगल्यात मागील तीन महिन्यांपासून बंद करून ठेवलं आहे आणि मला त्यांना भेटू दिलं जात नाही. मला त्यांच्याशी फोनवर देखील बोलू दिलं जात नाही. जेव्हा मी २४ जानेवारी २०२१ रोजी मुलांना भेटण्यासाठी चित्रकुट बंगल्यावर गेले, तेव्हा धनंजय मुंडे यांनी पोलिसांना बोलावले व मला मुलांना भेटू दिलं नाही. तरी धनंजय मुंडे यांना विधानसभेतून तत्काळ निलंबीत केलं जावं आणि भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्यासाठी त्यांना अयोग्य घोषित केलं जावं.

धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. माझी लहान मुलगी असून ती १४ वर्षांची आहे व बंगल्यावर कुणी महिला केअरटेकर देखील नाही. धनंजय मुंडे यांची वागणूक चांगली नाही. दोन्ही मुलांना माझ्या विरोधात भडकवलं जात आहे. यामुळे मुलांबरोबर काही वाईट घडलं तर, त्यासाठी धनंजय मुंडे जबाबदार असतील. मला माझ्या मुलांना भेटू द्यावं. अन्यथा मी २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसेन.”

धनंजय मुंडेंनी खुलासा करताना काय म्हटलं आहे-
“आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या वादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

“सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. (इंजंक्शन) त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. सदर मेडिएशनच्या दोन बैठका झालेल्या असून १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, “असे असताना आणि सहमतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अशाप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे. मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसून येतो”.

“सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे या प्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही. कृपया ही वस्तुस्थिती व न्यायालयीन प्रकरण व एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी,” अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments