मुंबई : अहमदनगर येथे घडलेले दुहेरी हत्याकांड हे भाऊबंदकीच्या वादातून घडले आहे, त्याला राजकीय वळण देऊ नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे तणाव निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक झाल्याप्रकरणी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
केडगावमधील पोटनिवडणुकीदरम्यान २ शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या हत्याकांडानंतर जमावाने दगडफेक करुन वाहनांची मोडतोड केली. त्यामुळे केडगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही हत्या राजकीय कारणावरून झाली नसून ती आपसातील भाऊबंदकीतून झाली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याला आता राजकीय वळण दिले जात आहे. मारणारे आणि मृतक यांचे नातेवाईक हे सर्व पक्षात आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली. बऱ्याच दिवसातून त्यांच्यात ही भांडणे चालू होती. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वादामुळे ही घटना घडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने याला राजकीय वळण देऊ नये, असेही ते शेवटी म्हणाले.