अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम यास अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी आज जामीन मंजूर केला आहे. दरम्यान छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारत मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे कोर्टात सांगितले.
अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी आज छिंदमला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. छिंदम याने स्वत:च न्यायालयात ०६ मार्च रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी ९ मार्च रोजी सुनावणी झाली. छिंदम याने स्वत:वरील आरोप नाकारले असून फिर्यादीबरोबर राजकीय वाद असल्याने माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, अशी भूमिका छिंदम याने न्यायालयात मांडली. तसेच आई आजारी असून तिची देखभाल करायची आहे. मी कुटुंबातील कर्ता असल्याने माझा जामीन मंजुर करावा, असा युक्तीवाद केला. वकील नसल्यामुळे छिंदम याने स्वत:च कोर्टात त्याची बाजू मांडली.
दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी १२ ते २ या वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी देणे व पोलीस तपासात हस्तक्षेप न करण्याच्या अटींवर न्यायालयाने छिंदमचा जामीन मंजूर केला आहे. सरकारतर्फे अॅड़ पी ए. स. चांदगुडे यांनी काम पाहिले. सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देणाऱ्या छिंदमने कोर्टात मात्र, सर्व आरोप नाकारत घुमजाव केले. मी ते वक्तव्य केलेच नसल्याचे छिंदम याने कोर्टात सांगितले.