अहमदनगर : यंदाच्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण गुरुवारी होणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या निमित्ताने गुरुवारी (२६ डिसेंबर) रोजी शिर्डी साईबाबा मंदिर तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी ८.०५ ते सकाळी ११ याकाळात कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिर ३ तास दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला आहे.
नाताळच्या सुट्टीनिमित्ताने लाखो भाविक शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र उद्या सूर्यग्रहण असल्याने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सकाळी तीन तास मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतरच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
तसेच ग्रहण काळात साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल. त्यानंतर ८.०५ ते ११ वाजेपर्यंत मंत्रोच्चार होतील. त्यानंतर सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी श्रींचे मंगल स्नान होईल. त्यानंतर ११.२५ मिनिटांनी आरती होईल आणि दुपारी मध्यान्ह आरती होईल.
सूर्यग्रहणारम्यान श्री साईसत्यव्रत आणि अभिषेक पूजा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यादरम्यान ऑनलाईन बुकिंग केलेल्या साईभक्तांकरिता सकाळी ७ ते ८ यावेळेत श्री साईसत्यव्रत आणि अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आल्याचं संस्थानाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
या ग्रहण काळात साईसमाधी आणि साई मुर्तीला दुर्वा-तुळशीचं आच्छादन घालण्यात येईल. त्यानंतर मंत्रोच्चार सुरू असतो. साईंच मंगलस्नान पार पडल्यानंतर मध्यान्ह आरती पार पडेल आणि त्यानंतर दर्शन पूर्ववत सुरू होईल. असेही सांगण्यात येत आहे.
राज्यात ग्रहणदर्शन….
राज्यात सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकले गेलेले दिसणार आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहण प्रारंभ झालेला दिसेल. ग्रहणरमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. या वेळांमध्ये स्थानपरत्वे काही प्रमाणात बदल होऊ शकतो.