धुळे: महाराष्ट्राने भगव्या रंगाला जन्म दिला त्यामुळे महाराष्ट्र भगवामय करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अशी भावनिक साद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धुळे येथे मतदारांना घातली.
आदीत्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहेत. मात्र,सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात आदित्य ठाकरे फिरत आहेत. धुळे येथे बोलताना आदित्य म्हणाले की, महाराष्ट्राने भगव्या रंगाला जन्म दिला त्यामुळे महाराष्ट्र भगवामय करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मी वरळीतून लढत असलो तरी मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतोय असे आदित्य यांनी आवर्जुन सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताना लोकानीं जे प्रेम दिले त्या प्रेमामुळे आज मी इथवर पोहोचलो. आज १७ ऑक्टोबरला युवासेनेला नऊ वर्ष पूर्ण झाली. इतक्या वर्षांमध्ये महाराष्ट्रभर फिरल्यावर एक स्वप्न मनाशी बाळगले ते म्हणजे नवा महाराष्ट्र घडविण्याचे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील व्यक्तींसाठी मला काम करायचे आहे. बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प आहे. आम्ही जे बोलतो ते महाराष्ट्रातील जनतेबद्दल परंतु विरोधी पक्षांतील नेत्यांना स्वतःशिवाय दुसरे काही दिसत नाही. असा टोला आदित्य यांनी लगावला.
राजकीय प्रश्नांवर टीका करायची सोडून हे लोक आमच्या वचननाम्यावर टीका करतात, परंतु आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत. विरोधी पक्षांच्या सत्तेतील १५ वर्षांचे नुकसान भरून काढण्यात आमची मागील पाच वर्षे गेली. परंतु जे मागील १५ वर्षात झाले नाही ते पुढील पाच वर्षात साकारणार आहोत असेही आदित्य यांनी सांगितले.
आदीत्य म्हणाले, माझे आजोबा शिवसेनाप्रमुखांनी मला एकदा सांगितले होते, निवडणूका येतात निवडणूक जातात पण आपण दिलेली वचने नेहमी पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे. आम्ही सत्ता आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर १००० केंद्रे सुरु करून १० रुपयात सकस आहार देणारच आहोत. तसेच ३०० युनिटपर्यंतचे वीजबिल कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतक-यांना कर्जाच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करून त्यांचा ७/१२ कोरा करु. प्रत्येक जिल्ह्यात फिरत्या दवाखान्याची सोया करणार असल्याचा आमचा संकल्प असल्याचेही आदित्य यांनी यावेळी सांगितले.