जळगाव : ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक जीपवर आदळला, यामध्ये जीपमधील आठ जण ठार झाले. हा अपघात आज सोमवारी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावानजीक महामार्गावर झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, एरंडोलकडून जळगावकडे किमान दहा ते बारा प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक लागली. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक थेट समोरून येणाऱ्या जीपला धडकला. अशी माहिती समोर आली आहे. यामुळे घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुर्देवाने रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाला.
जखमींना तातडीने एरंडोलच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.