जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज मंगळवार (३ मार्च) पासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. विशेष म्हणजे हा पेपर कॉपीहबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर देखील पोहचल्या असल्याचेही समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर हा धक्कादाय प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर, शिक्षण मंडळच्या सचिवांनी परीक्षेसंबंधी दिलेल्या आदेशांकडे केंद्र प्रमुखांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचे यातून दिसून आले आहे. या सर्व प्रकारामुळे पालकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, शिक्षण विभाग पुन्हा पेपर घेणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
यंदा विद्यार्थी संख्येमध्ये वाढ…
यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ११ वाजेपर्यंत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहाणेचेही सांगण्यात आले होते. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत परीक्षेसंबंधीची माहिती दिली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी २७३ भरारी पथक तैनात…
परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण २७३ भरारी पथकांसह बैठे पथकाची आणि विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र लाखबंद पाकीट पर्यवेक्षक परीक्षा कक्षातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील, असेही सांगितले गेले होते. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.