जळगाव : थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील तरुणांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावमध्ये पहिलीच सभा झाली. त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच, त्यांनी जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन, कलम ३७०, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी दोन्ही पक्षांची खिल्ली उडवली.