नाशिक : कोरोनाचं जगभरात धूमाकुळ सुरु आहे. त्यामुळे त्याचे मोठे परिणाम पाहायला मिळत आहेत. असाच परिणाम कांद्याच्या दरावरही झाला आहे. 15 मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली आहे. मात्र, त्यानंतरही कोरोनामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शनिवारच्या तुलनेत आज (16 मार्च) लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 250 रुपये प्रति क्विंटल घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकंदरच कोरोनाने कांद्यालाही रडवले असंच चित्र आहे.
कांदा निर्यात खुली करावी यासाठी नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. त्यामुळे अखेर केंद्र सरकारला निर्यात खुली करावी लागली. 15 मार्चपासून कांद्याची निर्यात बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सुरु झाली. मात्र, सध्या भारतासह जगभरात कोरोनाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या निर्यातीवरही दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांचीही चिॆता वाढली आहे.