मुंबई : जनतेने युतीला कौल दिला आहे त्यांनी सरकार स्थापन करावं. काँग्रेस महाआघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, आम्ही विरोधात बसणार असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
शरद पवार म्हणाले, शिवसेना आणि भाजपा यांची २५ वर्षांची युती आहे. आम्हाला जनतेने कौल दिलेला नाही. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला महाराष्ट्रात बसायचं आहे कारण जनतेने सत्तेचा कौल युतीला दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि हा पेच संपवावा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, संजय राऊत यांनी १७० चा आकडा कुठून आणला ते माहित नाही. आज त्यांनी माझी जी भेट घेतली ती सहज भेट होती. त्यांची आणि माझी भेट कायमच सकारात्मक होते तशी ती आजही झाली. वेगळं समीकरण असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भीती फक्त शिवसेनेला वाटते आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. २५ वर्षे युती सडली असं उद्धव ठाकरे म्हटले होते त्याबाबत काय भाष्य कराल असा प्रश्न जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आला तेव्हा २५ वर्षे सडले तरीही एकत्र लढले. भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांना सरकार स्थापन करु द्या नंतर बघू असंही शरद पवारांनी सांगितले.