मुंबई : शिवसेना हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे कोणीही भाजप आणि शिवसेनेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये. तुम्हांला केंद्रात राज्यमंत्रीचा दर्जा आहे. त्यात आपले अधिकार वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना लगावला आहे.
सोमवारी रामदास आठवले यांनी मी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली असून एक फॉर्म्युलाही सुचवला आहे. यावरून राऊतांनी आज आठवलेंचा समाचार घेतला. आठवले माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, मी संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यांना मी एक फॉर्म्युला सुचवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार तीन वर्षे मुख्यमंत्रिपद भारतीय जनता पक्षाला तर दोन वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यात येईल. यावर राऊत यांनी म्हटलं, जर भाजप या फॉर्म्युल्यावर सहमत असले तर शिवसेना नक्कीच यावर विचार करेल”.
पण आज संजय राऊत यांनी दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांना भाजप आणि शिवसेनेत मध्यस्थी करू नये असा सल्ला दिला आहे. त्यांनी त्यापेक्षा केंद्रात आपले अधिकार वाढवून घ्यावेत. तीन वर्षांचे मुख्यमंत्रीपद भाजपला आणि दोन वर्षांचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला आता हेच ऐकायचे बाकी होतं. रामदास आठवलेंनी राज्यात त्यांच्या लोकांची मंत्रीपदे वाचवावीत. तसेच स्वतःला केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्यासाठी अधिक अधिकार कसे मिळतील. याचे काम त्यांनी करावे, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.