महत्वाचे…
१.काँग्रेस सोडल्यामुळे राणेंची वाताहात झाली २. राणेंसाठी काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे आहेत ३.राणेंना काँग्रेसमध्ये यायचे असेल तर राज्यातले नेते वरिष्ठांशी बोलतील
मुंबई : नारायण राणेंनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं, त्यांच्यासाठी राज्यातले नेते दिल्लीमध्ये शब्दही टाकतील अशी ऑफरच काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना हुसेन दलवाई यांनी राणेंबद्दल काळजी व्यक्त केली. ‘काँग्रेस सोडल्यामुळे राणेंची वाताहात झाली आहे. पण राणेंसाठी काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे आहेत. फक्त पक्षात येताना कोणत्याही अटी ठेवू नका आणि त्या ठेवल्या तर त्याचा काय परिणाम होतो याचा अनुभव तुम्हाला आलाच आहे असा टोलाही दलवाईंनी लगावला. तसंच नारायण राणेंना जर काँग्रेसमध्ये यायचं असेल तर राज्यातले नेते दिल्लीमध्ये त्यांच्यासाठी शब्द टाकतील असं वक्तव्यही हुसैन दलावाईंनी केलं.
दरम्यान, पनवेल ते सिंधुदुर्ग ठिकठिकाणी खराब रस्त्याविरोधात २७ नोव्हेंबरला सत्याग्रह करणार आहे अशी माहितीही दलवाईंनी दिली. तसंच बुलेट ट्रेनमुळे कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाचे काम बाजूला टाकले गेले आहे असा आरोपही त्यांनी केला.