पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा अभिजीत वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचं आज निधन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नसल्यानं अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवड्यांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता.