नाशिक: भाजपमध्ये मेगाभरती सुरु आहे, पण लोक शहाणे आहेत, तेच निकाल लावतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या अधोगतीचे पुरावे लवकरच देऊ, असा इशाराही शरद पवारांनी दिला. नाशिकमध्ये पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्ष सोडताना शरद पवार हे आमचं दैवत आहेत, असं म्हणतात आणि पक्ष सोडतात. या नेत्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच टोला लगावलाय. सोडून जाणाऱ्यांच्या अंतःकरणात मी आहे असं ऐकतोय, असं म्हणत त्यांनी दबावाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप केला. आमच्या काही नेत्यांच्या संस्थांची चौकशी सुरु आहे. सरकारी यंत्रणाचा आयुध म्हणून वापर केला जातोय, असा टोला शरद पवारांनी लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटप ठरलं
येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील 288 जागांपैकी प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.