Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रShivjayanti 2020 : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती

Shivjayanti 2020 : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती

शिवजयंती २०२० Shiv Jayanti 2020: Information about the fort in Maharashtra

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 390वी जयंती आहे. शिवजयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. भारतातच नाहीतर अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. लोकमान्य टिळकांनी तरुणांना एकत्र कऱण्यासाठी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज पर्यंत राज्य आणि देशभरात शिवजंयती मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील काही गड किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती

  1. (प्रचंडगड ) तोरणा

पुण्यापासून ७० कि. मी. आणि भोरपासून ३५ कि. मी. उत्तरेला प्रचंडगड किल्ला आहे. पूर्वी याचे तोरणा नाव होते. शिवाजी महाराजांनी अनेक जुन्या किल्ल्यांची नवीन नावे ठेवली. १६५६ मध्ये त्यांनी तोरणा किल्ल्याचे नाव प्रचंडपणामुळे प्रचंडगड ठेवले. काही इतिहासकार प्रचंडगडाच्या इतिहासापासून हिंदवी स्वराज्याचा श्रीगणेशा समजतात. किल्ल्यात विजापूरच्या आदिलशाही सैनिकांची तुकडी राहात असे. पावसाळ्यात जोरदार पावसामुळे हि तुकडी काढून घेतली जात असे. याच वेळी शिवाजी महाराजांनी  किल्ला काबीज केला. त्यांनी याची नवीन किल्लेबंदी केली. याच्या खोदकामात त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली. त्याचा वापर त्यांनी राजगडच्या बांधकामात केला.

किल्ले तोरणा Torna Fort

राजगडाच्या पश्चिमेला सरळ रेषेत १६ कि. मी. वर नैऋत्य ईशान्य असा तोरणा पसरलेला आहे. हे अरुंद डोंगर,पठार मुरुंब देवाच्या समकालीन असावे. मुरुंबदेव हे ब्रम्हादेवाचं अपभ्रंश. पूर्वेची झुंजारमल माची हा या गडाचा सर्वात अरुंद आणि अवघड भाग. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना प्रथमतः तोरणा ताब्यात घेतला. तोरण्याच नाव बदलून त्याच्या आकाराला साजेस असं प्रचंडगड नाव  ठेवण्यात आले. तोरणा गडावर सोन्याच्या मोहोरांनी भरलेले बावीस हंडे सापडले. ते धन स्वराज्यस्थापनेसाठी शुभशकुन होत हे नककी. ते धन वापरून त्याच जागी अष्टभुजा महिषासुरमर्दिनी श्री तोरणजाईचं मंदिर बांधण्यात आलं आणि समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगडाची बांधणीही करण्यात आली.

  1. सिंहगड (कोंढाणा)

शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या,शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायहि तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा हि बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय  अवघड होते. शिवराय विचार करू लागले,या कामगिरीसाठी निवडावे कुणाला कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती.

sinhagad-fort

तानाजी मालुसरे आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई,दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हारी तयार मोठा हिमतीचा गडी तो अंगाने धिप्पाड  होता. बुद्धीने चलाख होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती.

तानाजीचा पराक्रम  इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदेभानला खबर  लागली. नगारा वाजला. उदेभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरु झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खनानू लागल्या. मशालींचा नाच सुरु झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिहासारखा लढत होता. उदेभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरु झाली. दोघेही शूर वीर कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला. शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू  लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले. आणि धारातीर्थी कोसळले.

तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाउ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले,पण ती वेळ दुःख करण्याची न्हवती,लढायची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला. आणि म्हणाला,आरे तुमचा बाप इथे मारून पडला आहे. तुम्ही असे भागुबाईसारखे का पळता मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला,पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना हि बातमी कळली. त्यांना. खूप दुःख झाले. गड ताब्यात आला,पण सिहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि आणि म्हणाले गड आला पण सिह गेला. कोंढाण्याचे सिहंगड हे नाव सार्थ झाले.

  1. रायगड (Raigad Fort)

महाडच्या साधारण उत्तरेला चांभारगड, सोनगड, लिंगाणा अशा गडाच्या कोंदण्यात बाजूच्या डोंगरापासून दुरावलेला सर्वदूर समान उंचीच्या काड्यांनी रेखलेला रायगड आहे. शिवकालापूर्वी रासीवटा किंवा तनस डोंगर म्हणून ओळखला जाई. महाराजांची तटबंदी व इमारती बांधून राजधानीचे ठिकाण म्हणून राजगडावरून या ठिकाणी रायगडावर हलवले.पूर्वपश्चिम  पसरलेल्या गडाच्या दक्षिण आणि उत्तरेच्या खाड्यांमद्ये वाघ दरवाजा आणि महादरवाजा आहे. सर्वोच ठिकाणी बालेकिल्ल्यार महाराजांचा राहता वाडा,सदर इत्यादी वास्तू आहेत. पूर्वेला दूरवर जगदीश्वर मंदिर आहे.

Raigad Fort

गडावरील सर्वसाधारण दर्शनी वास्तू म्हणजे मनोरे,सदर,वाडा,बाजारपेठ,जगदीश्वर,शिवसमाधी, महादरवाजा हि आहेत. सध्या गडाच्या पश्चिम कड्यातून रोपवे झाल्यामुळे गडावर कमी श्रमात आणि लवकर पोहोचता येते. पायवाटेने सुद्धा गडावर जाता येते. मोठ्या पायवाटेन दरवाजा  गाठायचा तिथे जोत्यांचे अवशेष व तोफा आहेत. आणि उजव्या हाताला सरळ गेला कि आपण खडकात खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. हि गुहा सातवाहन काळात खोदली गेली अस मानल जात. गुहेपासून पुढे जाऊन वळसा घातल्यावर समोरच्या झाडीतून वर चढत गेलेल्या पायऱ्यांनी सरळ गेल्यावर गडाचे महाद्वार आहे. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला.

  1. प्रतापगड (Pratapgad Fort)

महाबळेशवरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या ऐन धारेवर भोरण्याचा डोंगर नावाची एक टेकडी होती. या ठिकाणाच महत्व ओळखून शिवाजी महाराजांनी यावर तट बांधले. वाडा कुंभरेशी इथून गडाचा चढ सुरु होतो. सद्या दरवाजाच्या खाली अंदाजे पन्नास फुटापर्यंत डांबरी रास्ता झाला आहे. पन्नास फुटतील पायऱ्या चढून पूर्वाभिमुख महादरवाजातून गडात प्रवेश होतो. इथूनच पूर्वेकडे दोन बाजू बांधून काढलेली धार आहे. धारेच्या टोकाला  बुरुज आहे. गडाचे सर्व साधारण किल्ल्यांप्रमाणेच माची आणि बालेकिल्ला असे दोन भाग आहेत.

Pratapgad

गडावर महाराजांनी बांधलेलं भवानीमातेचं मंदिर आहे. हि अष्टभुजा भवानीमाता सिहारुढ महिषासुर मर्दिनी आहे. मंदिरात महाराजांच्या पूजेतील शिवलिंग आहे. गडाला एक प्रमुख दरवाजा आनि दोन चोरवाटा आहेत. त्यापैकी पाल दरवाजा ऐन कड्यावर असल्याने बुजवला आहे.

  1. राजगड

साह्याद्रीच्या दक्षिण उत्तर पर्वतराजाला कोदापूरपासून छेदणाऱ्या पूर्व पश्चिम फाट्यावर पश्चिमेकडून पूर्वेकडे तोरणा व राजगड असे दोन गिरीदुर्ग आहेत. राजगडाची पंधराव्या शतकापासून वेगळी नावे आढळतात. मुरुंबदेवाचा डोंगर आणि शहामृग (शाहमुर्ग) हे हि नाव आढळते. पंख पसरलेल्या गरुडासारखा गडाचा आकार आहे. बालेकिल्ल्याचा मध्य धरून उत्तरेला गडाची पदमावती माची आहे.तर पश्चिमेला संजीवनी माची आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याचे बांदकाम अतुलनीय आहे. गडावरील सध्याच्या प्रचलित वाटा पद्मावती माची आणि सुवेळा माचीवर येतात. बालेकिल्ला पद्मावती माचीपासून अंदाजे ६५० फूट उंचावर आहे. राजगडाच मूळ नाव मुरुंबदेव १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी या गडाची अव्दितीय रचना पाहिली आणि तोरणा  किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग करून गड आपल्या मनासासारखा बांधून घेतला.

Rajgad Fort (राजगड)

१६५० ते १६६९ पर्यंत शिवाजी महाराजांच वास्तव्य या गडावर होते. १६फेब्रुवारी १७०४ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. नंतर मराठ्यांनी पुन्हा तो हस्तगत केला. संजीवनीच्या टोकाला एक डोंगरसोंड खाली उतरलेली दिसते. या सोंडेवरून घसरकूंडी करत,तोल सांभाळत खालच्या खिंडीत उतरायच. खिंडीतून पाली भुतोंडे रस्ता आडवा पार होतो. अळू दरवाजातून इथवर यायला एक तास लागतो. खिंडीतील रास्ता ओलांडला कि समोर वर चढणारी वाट लागते. त्या वाटेवर चढू लागल कि आपण डोंगररांगेवर येतो. हि डोंगररांग थेट तोरण्याला जोडलेली आहे. त्यामुळे डोंगररांगेवरून तोरण्याकडे चालत जाता येते.

  1. लोहगड

मळवली रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेला विसापूर  आणि लोहगड या जोड किल्ल्यांच्या मधील खिंडीतून मळ्वलीपासून ६११ कि,मी, अंतरावर हा किल्ला आहे. तळातील लोहगडवाडी गावातून वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे ६ दरवाजे पार करूंन माथ्यावर दर्शनीच झेबुन्निसा आणि झिनतुन्निसा या औरंगजेबाच्या दोन मुलींच्या कबरी आहेत. त्यानंतर एक शिवमंदिर,विस्तीर्ण तलाव,लोमश ऋषींची गुहा आणि येक लेन इतक्याच ऐतिहासिक वास्तू गडावर आहेत. गडाचा आकार त्रिकोणी असून एक कोण पश्चिमेला आहे. इथेच थोड खाली विंचवाच्या नांगीप्रमाणे बाकदार उत्तरेकडे वळलेली माची आहे.

Lohagad Fort

विंचूकाटा टोक अस त्या माचीला आकारावरून पडलेल नाव आहे. गडाच्या तळात  उत्तरेला भाजे लेणी आहेत. लेणी पाहून भाजे गावात उतरून लोहगडाकडे जाता येत. गावातून बाहेर पडल्यावर विंचुकाटा दिसतो. डावीकडे विसापूर दिसतो. आणि या दोन किल्ल्यांच्या मध्ये गायखिंड दिसते. प्रशस्त पायवाटेनं अर्ध्या तासात खिंडीत पोहोचता येत. तिथून डावी वाट विसापूर व बेडसा लेण्याच्या बाजूला जाते. गडाच्या पायथ्याशी लोहगडवाडी आहे. लोहगडाची रचना सातवाहन काळातील किंवा त्याही आधीची असावी १६५७ मध्ये शिवाजीराजांनी लोहगड जिंकला पण १६६५ मध्ये मोगलांशी केलेल्या तहात त्यांना तो द्यावा लागला. नंतर संधी साधून १६७० मध्ये हा गड पुन्हा मराठी राज्यात सामील केला.

  1. सिंधुदुर्ग

महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधून मजबूत केली पाहिजे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हा सिंधुदुर्ग बांधण्याचे निश्चित केले. १६६४ साली बंदरावरील एका खडकापाशी गणपती,सूर्य,चंद्र,शिवलिंग,समुद्रदेवता आदी देवतांचे पूजन करून कामाला प्रारंभ केला. जवळ जवळ तीन वर्षे अहोरात्र काम चालू होते. तटाचा पाया भरताना शिस्याचा रस पायात ओतला. आणि त्यात पायाचे दगड बसवले किल्ल्याचे क्षेत्र सुमारे ४८ एकर असून भोवतीची तटबंदी दोन मैल भरेल इतका मजबूत तट बांधला. तट सर्पाकृती असून तीस फूट उंच आहे. रुंदी दोन बैलगाड्या जाऊ शकतील इतकी आहे. तटाला एकूण ५२ बुरुज आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला Sindhudurg Fort

किल्ल्याच्या वळणावळणाच्या प्रदेशद्वाराशी हनुमंताची प्रतिमा आहे. किल्ल्यात राजाराम महाराजांनी बांधलेले श्री. शिवराजेश्व्रराचे मंदिर आहे. त्याशिवाय भावानी,जरीमरी,महादेव,महापुरुष अशी देवळे असून महाराजांचा वाडा आहे. शेजारी साखरबाव,दूधबाव,दहीबाव इत्यादी विहीर ध्वजस्तभ,कामगारांचे वाडे इत्यादी बांधकाम केले. या सर्वांसाठी त्याकाळी एक कोटी होन इतका खर्च झाला. शिवाजी महाराजांनी सुरतेहून आणलेली लूट या कामी उपयोगी पडली.

  1. शिवनेरी

शिवाजीमहाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्या उत्तरेला पसरलेल्या सह्याद्रीच्या जागेतील ज्या दुर्गम किल्ल्यावर झाला त्याचे नाव शिवनेरी हा किल्ला दुर्गांनी वेढलेला आहे. पूर्वेस नारायणगड,उत्तरेस हरिश्चंद्रगड,पश्चिमेस चावंड,हडसर,जीवधन आणि दक्षिणेस राजमाची ढाक याप्रमाणे चारी बाजूनी पटावर सोंगट्या मांडाव्यात तसे हे दुर्ग आहेत. शिवनेरीची निर्मिती सातवाहनांनी केली. गडाचे एकूण सात दरवाजे निरनिराळ्या काळी बांधले,पाच दरवाजे चढून गेले की उजव्या हाताला कड्यात कोरलेल्या श्री. शिवाईच्या देवळात आपण पोहोचतो. हे भारतीयांसाठी अतिशय पवित्र स्थान मानले जाते. आणखी दोन दरवाजे ओलांडून गेले कि किल्ल्यात प्रवेश होतो.

शिवनेरी किल्ला Shivneri Fort

डाव्या हाताला आंबरखाना नावाचे धान्याचे कोठार आणि उत्तरेकडे उत्तम पाणी असलेली गंगाजमुना नामक जोडटाकी आहे. पुढे गेल्यानंतर श्री.शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेली दगडी इमारत आहे. छत्रपतीच्या प्रेरणेने ह्या इमारतीचा जीर्णोद्धार झाला आहे. तिच्या अलीकडे महाराष्ट्र शासनाने उभारलेली शिवकुंज नामक इमारत असून जिजाऊबाई आणि शिवाजीमहाराजांचे पंचरसी धातूंचे पुतळे आहेत. शिवछत्रपतींच्या जन्मामुळे हा किल्ला महाराष्ट्राचे पुण्यतीर्थ झाला आहे.

  1. मुरुड जंजिरा

मुरुड हे तालुक्याचे ठिकाण असून गावाच्या उत्तरेला एक खाडी आहे. किल्ल्यावर जाण्यापूर्वी ती ओलांडावी लागते. पुढे एक लहानशी टेकडी असून ती उतरून पलीकडे गेले कि सावित्री नदीची प्रचंड खाडी आणि तिच्यात एखाद्या प्रचंड कासवासारखा जंजिरा किल्ला दिसतो. किल्ला  खाडीत असल्यामुळे किल्ल्यावर बोटीत बसून जावे लागते. किल्ल्याच्या माहाद्वारातून आत शिरले कि तीन पेठा दिसतात.  महार, कोळी,चांभार इ. बलुतेदारांची आणि मुसलमानांच्या दोन, किल्ल्याच्या मध्यभागी दारुगोळ्याचे कोठार आहे. त्याच्या पश्चिमेकडे खजिन्याचे कोठार,दक्षिण दिशेला आणि वायव्येला पाण्याची दोन तळी आहेत.

मुरुड जंजिरा किल्ला Murud-Janjira Fort

बालेकिल्ल्यामध्ये किल्लेदाराचा चौखणी वाडा अंदाजे दीड दोनशे फूट उंचीवर आहे. याच्या दक्षिणेला कोळीवाडा आणि हिंदू शिल्पांचे अवशेष आहेत. सगळ्या किल्ल्याभोवती अतिशय मजबूत पक्कया बांधणीचा तट आहे. १०० फूट अंतर सोडून या तटास १९ बुरुज बांधले आहेत. प्रत्येक बुरुज कमानदार असून बुरुजाच्या मधून बाहेरच्या दिशेस तोंड करून प्रचंड तोफा मांडल्या आहेत. हा जंजिरा खाडीच्या मध्यभागी असल्यामुळे खारा वारा सतत वाहत असतो. महाराष्ट्रामध्ये मराठयांचे स्वराज्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी तीन वेळा हा किल्ला जिंकण्याचे कसोशीने प्रयत्न केले.

  1. सज्जनगड

सातारा जिल्ह्यात उरमोडी नदीच्या तीरावर असलेले परळी गाव सज्जनगडाच्या पायथ्याशी आहे. सातारा गावापासून अवघे ६ मैल अंतरावर आहे. गावाच्या पलीकडे किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. समर्थ भक्तांनी वरपर्यंत पायऱ्या बांधल्या आहेत. चढाच्या मध्यभागी डाव्या हातच्या देवळीत काल्याणस्वामींची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात किल्ल्याचे दोन मुख्य दरवाजे आहेत. पायऱ्या ओलांडून आत गेले कि गडाचा आटोपशीर माथा दिसतो. मुख्य इमारत श्रीराम मंदिर ओलांडून आणि त्यांच्या शेजारी असलेली श्री समर्थांची समाधी,राममंदिराच्या उत्तरेकडे पाण्याचे एक तळे आहे.

सज्जनगड Sajjangad

सज्जनगड अर्थात परळीचा किल्ला हा भोज शिलाहारानेच बांधला आसावा. स. १६६३ मध्ये हा शिवाजी राजांनी जिंकून घेतला. त्यानंतर आपले गुरु श्री रामदास स्वामी यांस मोठ्या आदराने आणून त्यांची स्थापना राजांनी या किल्ल्यावर केली. समर्थांच्या काळात महाराष्ट्रातील कित्येक संत महंतांचा राबता या किल्ल्यावर होता. १६८० साली शिवाजीमहाराजांचे निधन झाल्यावर श्री समर्थ उदास झाले आणि इथेच किल्ल्यावर त्यांनी १६८१ मध्ये समाधी घेतली. अस्वलगड,परडीचा किल्ला,नवरस तारा या इतर काही नावांनी सुद्धा सज्जनगड ओळखला जात असे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments