नवी दिल्ली : लोकसभेत ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’ला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत वेगळा निर्णय घेऊ शकते, असे संकेत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. आम्हाला कुणीही राष्ट्रभक्ती शिकवू नये, जे मानवतेच्या हिताचं आहे, तोच आमचा निर्णय असेल, असं राऊत यांनी सांगितलं. यामुळे शिवसेनेाचा विधेयकाला पाठिंबा नाही हे निश्चित झालं आहे.
नागरिकता सुधारणा विधेयकाबाबत आम्ही सदनात (राज्यसभा) आमचा मुद्दा मांडू, सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळालं, तर ठीक, अन्यथा आमचा निर्णय वेगळा असेल. लोकसभेतील संख्याबळ वेगळं होतं, राज्यसभेत वेगळी स्थिती आहे. तेव्हाचा निर्णय तेव्हा घेऊ, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
आम्हाला कुणीही राष्ट्रभक्तीबाबत मार्गदर्शन करु नये. जितका त्याग तुम्ही केला, त्यापेक्षा जास्त आम्ही केला. दर वेळी पाकिस्तानची भाषा, बांगलादेशची भाषा; या देशाचीही एक भाषा आहे. नेपाळमध्ये हिंदूंची अवस्था बिकट आहे. श्रीलंकेतील हिंदूंना का वगळलं? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले.
आपल्या देशाचे नागरिकही राष्ट्रभक्त आहेत, त्यांना कुठल्याही शाळेत राष्ट्रभक्ती शिकण्याची गरज नाही. आम्हीही खूप काही सहन केलं आहे. तुम्ही व्होट बँकेचं राजकारण करु नका. शिवसेनेवर कोणीही दबाव टाकू शकत नाही. जे आमच्या मनात असतं, तेच आमच्या ओठातही असतं. जे मानवतेच्या हिताचं तोच आमचा निर्णय असेल, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत आम्हाला काही स्पष्टता हव्या आहेत आणि त्या होत नाहीत, तोवर या विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतली.