Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रबंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर;शिवसेनेचा भाजपवर निशाणा

बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर;शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारं वाहत आहेत. भाजप, तृणमुल, काँग्रेस आणि डावे असे प्रमुख पक्ष आहेत. असं असलं तरी तृणमुल आणि डाव्यांमध्ये  थेट लढत होतीय. सत्ताधारी तृणमुलमधून आऊटगोईंग सुरु आहे. तर भाजपमध्ये इनकमिंग. या सगळ्या घडामोडीवर आजच्या सामना अग्रलेखातून  भाजपवर शरसंधान साधण्यात आलंय. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची, अशा शब्दात सामनातून भाजपवर टीका करण्यात आलीय.

 तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू

“तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ममता कॅबिनेटमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. त्याआधी आणखी दोन प्रमुख मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायची व तृणमूलचेच आमदार फोडून त्यांना भाजपची उमेदवारी द्यायची.

2014 साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तालुका, जिह्यात याच पद्धतीने फोडून भाजपने त्यांना उमेदवा-या दिल्या. त्यातले बरेच लोक निवडून आले. अशा तऱ्हेने भाजपने आपला आकडा फुगवला. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे”, असं अग्रलेखात म्हटलंय.

महाराष्ट्रातील भाजपची सूज त्याच पद्धतीची

“तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायचीस्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फौज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. महाराष्ट्रातील भाजपची सूज त्याच पद्धतीची आहे. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे”, अशी टीका सामनातून करण्यात आलीय.

बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर

“पश्चिम बंगालातील राजकारण दिवसेंदिवस रोचक आणि रोमांचक होताना दिसत आहे, पण रोमांचक वाटणारे बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. हिंदुत्वाच्या मुद्दय़ांवर ठरवून ठिणगी टाकायची, हे भाजपने ठरवलेले आहे. तसे नसते तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादार्चीं ठिणगी पडली नसती”, असंही सामनामध्ये म्हटलंय.

अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील

“शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले. ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील.

‘जय श्रीराम’च्या नाऱयांवर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता”, असंही सामनामध्ये म्हटलंय.“उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. त्यास काही प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. कमालीचा सेक्युलरवाद व टोकाचे मुस्लिम लांगूलचालन याचा वीट बहुसंख्य हिंदूंना येतच असतो”, असा टोला सरतेशेवटी ममतांना लगावण्यात आलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments