मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत संभाजीराजे यांनी गेल्या दोन वर्षांपासून रायगड प्राधिकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली. असंच काम होणार असेल तर या जबाबदारीमधून मला मुक्त करा, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
भेटीदरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले की, ‘मागच्या वेळी सरकारने रायगड संवर्धनासाठी 706 कोटी रुपये दिले. रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे. गेल्या दोन वर्षांत एक टक्काही काम झालं नाही. महाराजांपेक्षा मला कोणी मोठं नाही. म्हणून या कामात काही चूक व्हायला नको. वंशज म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मी आधी पासून आवाज उठवला आहे. पण असंच काम होणार असेल तर या जबाबदारीमधून मला मुक्त करा,’ अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
ही जबाबदारी तुम्हीच पार पाडा…
रायगड प्राधिकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली असली तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मात्र किल्ले रायगडच्या संवर्धनाची जबाबदारी तुम्हीच पार पाडा, अशी विनंती संभाजीराजेंना केली आहे. ‘याचं संवर्धन तुम्हीच करा. कारण तुमच्या शिवाय दुसरं कुणी करू शकणार नाही,’ असं उद्धव ठाकरे संभाजीराजेंना म्हणाले.
दरम्यान, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कारभारात गेली 2 वर्षे ठेकेदार खाबूगिरी करत असल्यामुळे रायगड किल्ला प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पण राज्यात नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्राधिकरणाच्या सर्व कारभाराबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज दुपारी संभाजीराजे छत्रपती मातोश्रीवर दाखल झाले होते.
खाबूगिरी आणि बाबूगिरी‘ला कंटाळले…
रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप खुद्द रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे भ्रष्टाचार आणि मनमानीला कंटाळून रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.