पंढरपूर: कर्जमाफीच्या घोळाचे नवनवे पुरावे दररोज मिळत असताना आता पंढरपूरमध्ये आणखी एक घोळ समोर आलाय. पंढरपूरमध्ये एका शेतकऱ्याच्या खात्यात आलेले कर्जमाफीचे पैसे लगोलग परत गेलेत. या प्रकरणावरुन शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफिच्या नावाने फसवणूक केली.
पंढरपूर तालुक्यातील उपरी गावाचे देवानंद गणपत जगदाळे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या गादेगाव शाखेतून ६४ हजार ४०१ रुपयाचे कर्ज घेतलं होतं. त्यांच्या खात्यात ३१ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीची रक्कम जमा झाली. त्यानंतर बँकेने देवानंद जगदाळे यांना मॅसेज पाठवून कर्जखाते संपल्याचं कळवलं. कर्जमाफीचा आनंद जगदाळे कुटुंबाला झाला, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. बँकेने १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा मॅसेज करत खात्यावरील पैसे सरकारने परत घेतल्याचं सांगताच जगदाळे हादरून गेले.
जगदाळे यांच्याच प्रमाणे गादेगाव येथील अर्जुन कदम यानादेखील ५६ हजार ५१६ रुपयाची कर्जमाफी झाली होती मात्र त्यांच्याही खात्यातील रक्कम परत सरकारने काढून घेतल्याने आता यांच्या आनंदाची जागा भीतीने घेतली आहे. त्यामुळे आता कर्जमाफीचे घोळ कधी संपतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.