शिवसेना भाजपाचे स्वतंत्र्य जाहीरनामे म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी केली. खासदार सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत सेना भाजपावर शरसंधान साधले.
भाजपा आणि शिवसेनेने कोणतीही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. म्हणून ते 370 बाबत बोलत आहेत. शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत विचारलं असता, “मागील पाच दशकांपासून शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे” त्याचमुळे शरद पवारांवर टीका केली जाते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याचं देशातले नेते सांगत आहेत. त्याबाबत केंद्राचं अभिनंदन मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत हा मुद्दा का आणत आहात? असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम अतिआत्मविश्वासात वावरत असतात. मात्र, यंदा परिवर्तन नक्की होणार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येणार असाही विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.