कोल्हापूर : माझी पत्नी अश्विनी बिद्रे यांच्या हत्त्येची सत्तारूढ तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरूंदकर याच्या फ्लॅटवर येऊन गेले होते असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
गुरूवारी दुपारी गोरे तसेच अश्विनी यांचे वडील जयकुमार व बंधू आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी मोठा राजकीय दबाव असल्याचाही आरोप केला आहे. राजू गोरे म्हणाले, ११ एप्रिल २०१६ पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता आहेत.
याच दिवशी संध्याकाळी राजेश पाटील आणि सत्तारूढ तीन आमदार अंधेरी परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. तेथे अभय कुरूंदकर याचा फोन आला. यानंतर हे चौघेही कुरूंदकर याच्या फ्लॅटवर गेले. तेथे बराच वेळ हे सर्वजण होते. त्यामुळेच त्यांना या हत्त्येची संपूर्ण कल्पना होती. खडसे यांचा भाचाच यामध्ये अडकल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत राजकीय दबाव आहे.
लष्करामध्ये १८ वर्षे सेवा बजावलेले जयकुमार बिद्रे म्हणाले, परिस्थिती नसतानाही मी तीन मुलांना शिकवलं. अश्विनी शिकली, चांगल्या नोकरीला लागली. एकदा मुलं मोठी झाल्यावर त्यांना आम्ही कशाबाबत आणि काय सांगायचं? मात्र एका बाईला मारण्यात कसला आलाय पुरूषार्थ असा प्रश्न विचारत या प्रकरणी अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी बिद्रे यांनी यावेळी केले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
अशा आहेत मागण्या…
१. हा गुन्हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा व अॅड. उज्वल निकम यांची या केसमध्ये नियुक्ती करावी
२. अभय याचा भाऊ संजय कुरूंदकर पुण्यात पोलिस दलात आहे. त्याची बदली गडचिरोलीला करावी.
३.नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांना सहआरोपी करा.