औरंगाबाद : दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज आणि उद्या १५ आणि १६ मार्च रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. या काळात गारपीट अथवा वादळाची शक्यता नसून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे.
राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होऊन २ दिवसात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्यातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्री फुंडकर यांनी केले.
या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन शेतमालाचे नुकसान टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.