मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील मातोश्रीवरील बैठक संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि माझा जुना परिचय असल्याने बराच वेळ चर्चा झाली. मात्र बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
तो निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील!
विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम असल्याने भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट असल्याचं म्हटलं जात होतं. “परंतु नारायण राणेंबाबत चर्चा करण्याइतपत मी मोठा नेता नाही, त्याबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील,” असं पाटील म्हणाले.
इतरांच्या कामात ढवळाढवळ करत नाही
मातोश्रीवरील भेटीत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा खड्ड्यांचा दौऱ्याबाबत माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. “मी फक्त मला दिलेलं काम पार पाडतो, इतर कामात ढवळाढवळ करत नाही. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघेही पश्चिम महाराष्ट्राच्या दौरावर असल्याने एकाच विमानात जा, अशी विनंती त्यांना केली. मात्र वेळ वेगळी असल्याने ते शक्य नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. “उद्धवजींचं कोल्हापुरातच काय अवघ्या महाराष्ट्रात नेहमीच स्वागत करु,” असंही ते म्हणाले.