मुंबई : मुस्लिम आरक्षणावर प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर विचार होईल. मुस्लिम आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप सरकारपुढं आलेला नाही. त्यामुळं त्यावर निर्णय होण्याचा प्रश्न नाही. विरोधकांनी त्यावरून आदळआपट करू नये,’ अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांना सरकारच्या निर्णयाशी संबंधित अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मुस्लिम आरक्षणाबाबत मागील आठवड्यात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली होती. राज्य सरकार मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर कायदा करण्यात येईल, असं मलिक यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव आमच्यापुढं नाही. तोपर्यंत विरोधकांनी आदळआपट करण्याची गरज नाही. ही एनर्जी मुद्दा आल्यावर वापरण्यासाठी जपून ठेवा. असा टोलाही उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले, ७ मार्चला अयोध्येला जाणार…
‘येत्या ७ मार्चला प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ‘देवदर्शनाचा राजकारणाशी संबंध नाही. देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. त्यामुळं ज्यांना कुणाला माझ्यासोबत यायचं आहे, ते येऊ शकतात,’ असंही ते म्हणाले.