गडचिरोली : आम्हाला महाराष्ट्र आणि कलम ३७० चा काय संबंध अशी विचारणा करतात. शरद पवार तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवं आहे हे देखील माहिती नाही, अशी घणाघाती टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
गडचिरोली येथे आज अमित शाह यांनी भाजपच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी हिंमत असेल तर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर ३७० कलम पुन्हा आणू असं बोलून दाखवावं असं आव्हान दिलं आहे.
यावेळी अमित शाह यांनी ३७० कलम हटवण्यावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर देत आमच्यासाठी देशासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे असं सांगितलं. “हा छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि टिळकांचा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरु झाली होती. आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि ३७० चा काय संबंध अशी विचारणा करतात. असा सवाल उपस्थित केला.
महाराष्ट्रात एकीकडे भाजपा जिथे मोदींच्या नेतृत्त्वातील देशभक्तांचा पक्ष आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवारांची घराणेशाही असणारा पक्ष आहे,” अशीही टीका अमित शाह यांनी केली.