यवतमाळ : हवाई दलाच्या शौर्याचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय लाभासाठी वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.पवार सध्या दोन दिवसीय विर्दभ दौऱ्यावर असून यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ इतिहास रचला नाही, तर भूगोलही बदलला. मात्र, त्यांनी याचा कधीही राजकीय लाभासाठी वापर केला नाही. दुर्देवाने सध्या पुलवामा आणि उरीतील सैन्याच्या अतुलनीय कार्याचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय लाभ मिळवण्यासाठी गैरवापर केला जात आहे. असा वापर करणं भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. तसेच, सीबीआय, ईडी सारख्या संस्थांचा सत्ताधार्यांकडून पुरेपूर गैरवापर केला जात आहे.
सरकारच्या विरोधात बोलणार्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचाही त्यांनी यावेळी आरोप केला. सत्तेचा गैरवापर किती करायचा यांची मर्यादा सत्ताधाऱ्यांना राहिलेली नाही, असेही ते म्हणाले. यामुळे सत्ताधारी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.