कोल्हापूर : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांची तर उपाध्यपदी सतीश पाटील यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला. यामुळे कोल्हापूर जिल्हा आता भाजपमुक्त झाला आहे.
भाजपचे अरुण इंगवले यांना २४ तर बजरंग पाटील यांना ४१ मतं मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. जिल्हा परिषदेतील या निकालामुळे भाजप कोल्हापुरातून हद्दपार झाली आहे. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. तसेचं दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. याशिवाय महापालिकेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. केवळ कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र अडीच वर्षात ती सत्ता सुद्धा हातातून निसटली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाराष्ट्र विकास आघाडीने एकत्र येऊन कोल्हापूर झेडपीतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला होता. त्यामध्ये त्यांना यश आलं. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
महाविकास आघाडीमुळे भाजपला जिल्हा परिषदेवरील आपली सत्ता टिकवणे प्रतिष्ठेचे बनले होते. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली होती. तर दुसर्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिवसेनेला सोबत घेण्याची रणनीती आखली. त्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी प्रदेश पातळीवरून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे एक तारखेला आम्ही बहुमताच्या पुढे असू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोन्ही मातब्बर नेत्यांनी भाजपची सत्ता उलथवून लावली आहे.
जिल्हा परिषदमधील २०१७ चा पक्षीय बलाबल…
भाजप – १४
काँग्रेस – १४
राष्ट्रवादी – ११
शिवसेना – १०
जनसुराज्य – ६
इतर स्थानिक आघाड्या आणि अपक्ष ११