कोल्हापूर : रुस्तुम ए हिंद आणि महान भारत केसरी पैलवान दादू चौगुले यांचं आज 20 ऑक्टोबर निधन झालं. वयाच्या 73 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखवणारे दादू चौगुले यांची ओळख होती.
काही दिवसांपूर्वी धाप लागल्याने दादू चौगुले यांना कोल्हापुरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. यावेळी उपचारादरम्यान ते कोमामध्ये गेले. रविवारी 20 ऑक्टोबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कोल्हापूरसह राज्यभरातील त्यांच्या शिष्यांना धक्का बसला आहे.
दादू चौगुले यांचा लाल मातीसोबतच मॅटवरच्या कुस्तीत हातखंड होता. न्यू मोतीबाग तालमीच्या माध्यामातून अनेक मल्लांना घडवण्याचे काम केले. मैदानातील कुस्ती, कुस्तीचा प्रसार, संघटन प्रशिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी प्रभावी कामगिरी केली.
वयाच्या दहाव्या वर्षी दादू चौगुले यांनी लाल मातीत कुस्ती खेळायला सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावातील आखाड्यात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. दादू चौगुले यांना कुस्तीचे बाळकडू वस्ताद हिंद केसरी गणपत आंदळकर, बाळू बिरे यांच्याकडून मिळाले. छोट्या छोट्या कुस्त्या मारणारा हा मुलगा वस्ताद गणपतराव आंदळकरांच्या मनात भरला. त्यांनी मोठी मेहनत करून घेत दादू यांना कुस्तीचे डावपेच शिकवले. त्यानंतर दादू यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत अनेक मानाच्या गदा पटकावल्या.
परशुराम पाटील यांना पराभूत करून 1970 मध्ये दादूंनी महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं. दादू चौगुलेंनी लाल मातीबरोबर मॅटवरही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला होता. त्यानंतर 1973 साली दीनानाथ सिंह यांना उद्या एका मिनिटात नमवून रुस्तुम-ए-हिंद आणि दिल्लीच्या नेत्रपाल यांना लोळवून महान भारत केसरी ही मानाची गदा दादू चौगुले यांनी पटकावली होती.
तसेच 1973 मध्ये न्यूझीलंड झालेल्या स्पर्धेत 100 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात दादूंनी रौप्य पदक मिळवल होतं. त्यांची ही कुस्ती परंपरा त्यांचा मुलगा विनोदने हिंदकेसरी किताब पटकावून पुढे चालू ठेवला आहे.प्रख्यात अभिनेता आमिर खान याने दंगल या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर हिंदकेसरी दादू चौगुले मार्गदर्शन करत असलेल्या मोतीबाग तालमीला भेट दिली होती.
आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीच्या वाढीसाठी सक्रीय योगदान दिले. ते कोल्हापूर शहर व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष होते. या माध्यमातून ते कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी संघटनात्मक काम करत होते. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी मेहनतीने घडवले. कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेण्यातही दादूंचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला.