सांगली : भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्यावर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला. भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाहीच असे वादग्रस्त विधान भिडे यांनी केले. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संयुक्त राष्ट्रसंघातील वक्तव्यावर बोलतांना संभाजी भिडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो, ते काम आपलं आहे. देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत, असं संभाजी भिडेंनी म्हटलं.
भिडेंच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर भिडेंच्या आक्षेपाचा जोरदार समाचार घेतला आहे. भिडे हे मराठा आणि बौध्द धर्मात दंगली लावण्याचे काम करत आहेत. अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आरोपी असलेल्या भिडें बाबत न्यायालयाने ताशेरे ओढले होते.