सातारा : पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतांमधून आशीर्वाद दिला. मात्र, यामुळे त्यांचा अहंकार वाढला. हा अहंकार मोडून काढायचा आहे अशीही घणाघाती टीका उदयनराजे भोसले यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पोलाद पुरुष आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साताऱ्यात कौतुक केलं. कलम ३७० वरुन मोदींवर टीका केली जाते मात्र देशाचे जवान आपल्याला महत्त्वाचे नाहीत का? त्यामुळे कलम ३७० हटवलं आणि तो मुद्दा विधानसभा निवडणूक प्रचारात आणला तर बिघडलं काय? असंही उदयनराजे यांनी विचारलं.
सातारा ही चळवळीची भूमी आहे, या भूमीत स्वातंत्र्याची चळवळ, देशरक्षणाची चळवळ झाली आहे. या मातीचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं आहे. त्यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे देखील साताऱ्यातलेच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार, भारताबाबतचं त्यांचं व्हिजन यामुळेच विकास होतो आहे असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांवर मोदी सरकारची वाटचाल होते आहे असंही उदयनराजे भोसले म्हणाले.