सोलापूर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधलेल्या रश्मी बागल यांना आज करमाळा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. मात्र , शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे पाटील यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर गोंधळ घातला.
पंधरा दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देऊन जुन्या शिवसैनिकांना धक्का देण्यात आला. स्थानिक शिवसेना आमदार नारायण पाटील हे रश्मी बागल यांच्या प्रवेशामुळे नाराज होते. मला तिकीट न मिळाल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, असंही नारायण पाटील म्हणाले होते. शिवाय त्यांनी त्यांची भूमिका पक्षासमोरही मांडली होती. अखेर मातोश्रीवर विद्यमान आमदार नारायण पाटील यांची कोणतीही दखल न घेता. रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. मात्र अवघ्या 253 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आता त्या शिवसेनेकडून आपले भाग्य आजमावणार आहे.