जळगाव : दिल्ली हिंसाचार हा पूर्वनियोजीत कट होता. दिल्ली हत्याकांडानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा मागितला होता. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळेंनीही दिल्ली हिंसाचारावर तोफ डागली. हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी अशी मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे आज शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) जळगावच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशात आलेले असताना दिल्लीत अशा पद्धतीने दंगल होणे, हे खरं तर गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे.
दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी पंतप्रधान कार्यालयातून झालीच पाहिजे. परंतु त्या आधी ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. अमित शाहांच्या जागी मी असते तर निश्चितच आत्मचिंतन केले असते, असेही त्या म्हणाल्या.