गत दोन दिवसांपासून अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या लग्नाच्या चर्चेचा बाजार गरम आहे. चर्चा खरी मानाल तर अनुष्का व विराट येत्या १२ डिसेंबरला इटलीत लग्न करणार आहे. पण गुरुवारी रात्री हे लव्हबर्ड्स स्वित्झर्लंडला रवाना झालेत. अर्थात दोघांनीही वेगवेगळ्या शहरातून उड्डाण भरले. अनुष्काने स्वित्झर्लंड मुंबईतून फ्लाईट घेतली तर विराटने दिल्लीतून. यादरम्यान विराटने आपला अर्धा चेहरा लपवलेला होता. विराट रात्री ११. ३० व्या सुमारास दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. त्याची फ्लाईट पहाटे २.४५ची होती. अनुष्का आपल्या कुटुंबासोबत दिसली. पापा अजय कुमार शर्मा, मम्मी आशिमा शर्मा आणि भाऊ करणेश शर्मा तिच्यासोबत होते. पत्रकारांनी या सर्वांना अनुष्काच्या लग्नाबद्दल विचारले. पण सर्वांनी मीडियाशी बोलणे टाळले.
गेल्या दोन दिवसांपासून अनुष्का व विराट लग्न करणार, अशीच बातमी आहे. उद्या ९ डिसेंबरपासून या लग्नाचे विधी सुरु होत आहेत, असेही सांगितले जात आहे. विराटचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी आधीपासूनच इटलीसाठी तिकिट बुक केले आहे. विराटचे अगदी जवळचे मानले जाणारे कोच राजकुमार शर्मा यांनी यादरम्यान सुट्टी घेतल्याने या चर्चेला बळ मिळत आहे. सुट्टीसाठी त्यांनी लग्न असे कारण समोर केले आहे. हे लग्न कुणाचे, असे त्यांना विचारले गेले, तेव्हा भाच्याचे, असे त्यांनी सांगितले. विराटही डिसेंबरमध्ये दीर्घ सुट्टीवर आहे. विराटने आपल्या खासगी कारणांमुळे दीर्घ सुट्टी घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. काही दिवसांपूर्वी विराट व अनुष्का दोघेही डिझाईनर सब्यसाची यांना भेटले होते. कदाचित ही भेट वेडिंग आऊटफिट सिलेक्शनसाठी असावी, असा अंदाज यानंतर बांधला जात आहे. दोघांचेही लग्नाच्या चर्चेसाठी आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे, अनुष्कासाठी १२ डिसेंबर ही तारीख लकी आहे. याच तारेखला अनुष्काचा पहिला चित्रपट ‘रब ने बना दी जोडी’ रिलीज झाला होता. कदाचित यामुळे लग्नासाठी तिने ही तारीख निवडली असावी, असे बोलले जात आहे.