मुंबई : नागरिकत्व कायद्यावरून देशभरात वातावरण गोंधळ सुरु आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात बॉलीवूड कलाकारांनी आघाडी घेतली आहे. परंतु अभिनेता अजय देवगणने यावर भूमिका स्पष्ट केली. जर मी नागरिकत्व कायदा या विषयावर बोललो तर त्यावर प्रतिक्रिया उमटतील. माझा ‘तानाजी’ चित्रपट बंद पाडला जाईल. हे सर्व कोण झेलणार?’, अशी भिती व्यक्त केली. असे अजयने एका मुलाखती दरम्यान सांगितले.
नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशात कुठे विरोध तर कुठे समर्थन सुरु आहे. त्यामुळे देशात एकप्रकारचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वरा भास्कर, जावेद जाफरी, फरहान अख्तर, सुशांत सिंग, अनुराग कश्यप, रिचा चड्डा, आयुष्यमान खुराणा, विशाल गगलानी, हूमा कुरेशी यांच्यासह अनेक कलाकारांनी विरोध दर्शविला होता. यावर चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलावतांन मौन बाळगून आहेत. काही कलावंतांचा अपवाद वगळता सेलिब्रिटी मंडळी हा विषय टाळताना दिसत आहे. ‘देशातील सध्याची स्थिती चिंताजनक आहे’, असे मतप्रदर्शन करणारा अभिनेता सैफ अली खानही यावेळी अजयसोबत होता.
अजय म्हणाला ‘मी या विषयावर काही बोललो तर कुणीतरी त्याने दुखावला जाण्याची शक्यता आहे. मी किंवा सैफ व्यक्त झाल्यास, लोक उद्या त्याविरुद्ध निदर्शने सुरू करतील. ते तानाजी चित्रपटच बंद पाडतील. या स्थितीत नुकसान कुणाचे होणार? अर्थात निर्मात्याचेच होणार आणि या चित्रपटाचा निर्माता मी आहे. म्हणूनच माझी जबाबदारी वाढते. आमिर खान, संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काय घडले, ते तुम्ही पाहिलेच असाल!’
एखादा चित्रपट बनवत असताना त्यात खूप मोठी टीम काम करत असते. त्यामुळेच चित्रपटाचे नुकसान झाल्यास या टीमलाच त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळेच खूप सावधपणाने आणि भान राखून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, असेही अजय पुढे म्हणाला. कलाकारांचा मोठा प्रभाव जनमानसात असतो. कधी-कधी तुम्ही एखादा विनोद करून जाता मात्र प्रत्यक्षात तो गांभीर्याने घेतला जातो. म्हणूनच आम्हाला खूप जबाबदारीने वागावे लागते. एखाद्या गोष्टीबद्दल सगळ्या बाबी जाणून घेतल्यानंतरच त्यावर व्यक्त व्हावे लागते, असेही अजय म्हणाला.
प्रत्येक बाबतीत आमचे असे मत असायलाच हवे आणि ते असतेही, मात्र ते केव्हा मांडायचे आणि केव्हा मांडू नये, हे आम्हाला चांगला ठाऊक आहे, असे नमूद करतानाच सध्याच्या स्थितीवर माध्यमांमधूनच कशाप्रकारे वेगवेगळ्या भूमिका घेण्यात आल्या आहेत व त्यामुळे कशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, यावर अजयने बोट ठेवले. वीर योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या निमित्ताने अजयने एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले.