मुंबई : श्रीदेवी यांचा पार्थिव दुबईहून आज रात्री १०:३० वाजता मुंबईत आणलं जाणार आहे. उद्या दुपारी अंतिमसंस्कार होण्याची शक्यता असून, श्रीदेवीच्या कुटुंबियांनी अंतिमसंस्काराची संपूर्ण तयारी करुन ठेवली आहे. दररोज त्यांच्या निवासस्थानी बॉलिवुड मधील सर्व कलाकार सांतत्वानासाठी येत आहेत. तसेच चाहतेही मोठ्या प्रमाणात अंधेरी येथील बंगल्याबाहेर गर्दी करत आहेत.
चौकशी केल्यानंतर दुबईच्या सरकारी वकिलांनी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे सांगत, या प्रकरणाची फाईल बंद केली आहे. चौकशीची प्रक्रिया आटोपल्यानंतर श्रीदेवींचे पार्थिव कपूर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले असून, आज रात्री श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत पोहोचेल. दरम्यान उद्या श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शवविच्छेदन अहवालात श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे तसेच त्यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवींच्या मृत्यूबाबत गुढ निर्माण झाले होते. हे प्रकरण हायप्रोफाइल असल्याने दुबई पोलिसांनी सखोल तपास करत श्रीदेवींचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील स्टाफ तसेच पती बोनी कपूर आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर आज दुपारी श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी परवानगी दिली होती. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले होते.