चेन्नई: गेल्या अनेक दिवसांपासून रजनीकांत राजकारणात येणार का याची चर्चा सुरू होती. आता याबाबत रजनीकांत स्वत:च ३१ डिसेंबरला घोषणा करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. रजनीकांत खरच राजकारणात एन्ट्री करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिणेतला सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. त्याचं फॅन फॉलोअिंग प्रचंड आहे. दक्षिणेत सिने कलाकार राजकारणात जाण्याची परंपरा आहे. करूणानिधी,जयललिता आणि एमजीआर तिघंही सिने कलाकार होते. पण जयललिताच्या मृत्यूनंतर आता पुढे कोण असा प्रश्न पडला होता. रजनीकांतनी राजकारणात यावं अशी मागणीही करण्यात येत होती.
आता स्वत: रजनीकांतनेच याबद्दल खुलासा दिला आहे. मी राजकारणात येणार की नाही याचा निर्णय ३१ डिसेंबरलाच घेणार, अशी घोषणा खुद्द रजनीकांत यांनीच केली आहे. मला काही राजकारण नवीन नाही. मला खरंतर उशीर झालाय. पण प्रवेश करण हे विजयासारखंच आहे. असं ते म्हणाले आहेत. ३१ डिसेंबरला निर्णय जाहीर करीन, असं ते म्हणाले. आज सकाळी त्यांनी चेन्नईमध्ये चाहत्यांची भेट घेतली. तामिळनाडूच्या १८ जिल्ह्यांचा दौराच त्यांनी काढलाय. मे महिन्यातही रजनीकांत यांनी चाहत्यांना भेटण्याचा सपाटा लावला होता. तेव्हा त्यांनी राजकारणात येण्याबाबत पहिल्यांदा सुतोवाच केलं होतं. देवाची इच्छा असेल तर राजकारणात येईन. असं ते तेव्हा म्हणाले होते. आता रजनीकांत राजकारण्यात आले तर तामिळ नाडूच्या राजकारणात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.