मुंबई : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जीव धोक्यात घालून दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडून देणाऱ्या मुंबईतील १४ पोलिसांना पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासह अन्य १४ पोलिसांनी कसाबला पकडण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना एका रँकनं पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वीह या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे सन्मान लाभले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रमार्गे आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले होते. त्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांपैकी इस्माइल खान व अजमल कसाब हे दहशतवादी स्कोडा कार घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. गिरगाव येथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांची कार अडवली आणि त्यांना घेरले. त्यावेळी झालेल्या चकमकीत इस्माइल खान मारला गेला तर बंदुकधारी कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले होते.