मुंबई : मुंबई-मांडवा रो-रो सेवेला मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळं मुंबई-अलिबाग हे अंतर चार तासांवरून एका तासावर येणार आहे. हा प्रवास घडवणारं पहिलं रो-रो जहाज बुधवारी मुंबईच्या बंदरात दाखल होणार आहे.
मुंबई आणि मांडवा दरम्यान हे जहाज धावणार…
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी ही माहिती दिली. ग्रीसमधील ‘एस्कॉयर शिपिंग’ कंपनीनं या जहाजाची बांधणी केली आहे. मुंबई आणि मांडवा दरम्यान हे जहाज धावणार असून त्यामुळं मुंबई-अलिबाग हे अंतर चार तासांवरून एका तासावर येणार आहे. रो-रो सेवेमुळं रस्त्यावरील वाहतूक कोंडी टळणार असून इंधन बचतीमुळं प्रदूषणाचं प्रमाणही कमी होणार आहे. दरवर्षी अंदाजे २० लाख लोक मुंबई गेट-वेहून मांडव्याला ये-जा करतात. त्यातील काही छोट्या बोटीचा आधार घेतात. तर काही रस्तेमार्गे कार किंवा बसनं जातात.
५०० प्रवासी व १८० कारची वाहतूक करू शकते...
रो-रो जहाज एकावेळी ५०० प्रवासी व १८० कारची वाहतूक करू शकते. सुरुवातीला दर तीन तासांनी जहाजाच्या फेऱ्या होतील. कारच्या वाहतुकीसाठी एका बाजूचं भाडं एक ते दीड हजार असेल. तर, प्रवाशांसाठी हेच भाडं प्रत्येकी २३५ रुपये असेल.