मुंबई : साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर आज सोमवार (२० जानेवारी) ला मुख्यमंत्र्याच्या बैठकीनंतर पडदा पडला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादावर पडदा पडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केली होती. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते. पाथरी नव्हे तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. याप्रश्नी चर्चेअंती तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचवेळी बंद मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली होती. या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी रविवारी रात्री बंद मागे घेतला होता. दरम्यान, या प्रश्नावर आज सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला.