मुंबई : भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजपा सत्तास्थापनेसाठी तयार असल्याचं वक्तव्य केलं. यावरून काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं. सुधीर मुनगंटीवारांचं विधान म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असा टोला हाणला.
तिन्ही पक्षात वितुष्ट निर्माण व्हावं हा भाजपचा प्रयत्न आहे. माध्यमांनी त्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करावे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी समान कार्यक्रमावर झालेली आहे. आघाडीचं सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यांची चिंता भाजपने करु नये. असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार…
”शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आताही शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून अडचण नाही. ‘देर आये दुरूस्त आये, सुबह का भूला श्याम को आया’ असं आम्ही समजू,” असं मुनगंटीवार म्हणाले होते. त्याचबरोबर “मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. पण, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपाची भूमिका आहे,” असं सांगत त्यांनी मनसेबाबत भाजपाचं मत अनुकूल असल्याचंही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं.
मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला…
शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीविषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेनेला काँग्रेसनं पाठिंबा देणं हे २१व्या शतकातील आश्चर्यच आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते सत्तेत गेले. मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. “भिन्न विचारांचे सरकार दीर्घकाळ टिकत नाही, असा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. या सरकारची स्थिती व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासारखी आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला