नवी दिल्ली : शाहीनबागचा रस्ता सुरू करणं हे भाजपसाठी दोन मिनिटांचं काम आहे पण ते असं करत नाहीत. रस्ता सुरू झाला तर मग निवडणुकीसाठी मुद्दाच उरणार नाही, असा आरोप आपचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर लावला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजपचे नेते विकासाच्या मुद्यांऐवजी, शाहीन बाग, अतिरेकी, पाकिस्तान यामुद्द्यावर बोलताना दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाकखत दिली. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. शाहीनबागमधल्या आंदोलनाचा भाजपला फायदा होतोय. हा मुद्दा संपावा असं भाजपला वाटत नाही, असं ते केजरीवाल म्हणाले.
भाजपचे नेते फक्त शाहीनबागबद्दलच बोलतात, त्यांच्याकडे हाच एक मुद्दा आहे. मी म्हणतो शाळा बांधा, ते म्हणतात शाहीनबाग. मी म्हणतो, हॉस्पिटल बांधा, ते म्हणतात शाहीनबाग, अशा शब्दांत केजरीवाल यांनी त्यांचा मुद्दा मांडला. दिल्लीच्या जनतेसमोर जे प्रश्न आहेत त्यावरून त्यांना लोकांचं लक्ष वळवायचं आहे, असंही ते म्हणाले.
तर भाजपमध्येच करंट येईल…
भाजपचे नेते, इथे बटन दाबा आणि करंट तिथे येईल’ अशी भाषा करतात. जर शाहीनबागचा रस्ता खुला झाला तर भाजपमध्ये करंट येईल, असंही त्यांनी सांगितलं. मी शाहीनबागच्या मुद्द्यावरून मागे कसा काय हटू शकतो? मी स्वत:ला हरवण्यासाठी हे करेन का? मी फक्त देशासाठी उभा आहे, असंही केजरीवाल म्हणाले.
केंद्र रस्ता खुला करत नाही…
शाहीनबागच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची माझी इच्छा आहे पण हा प्रश्न केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो. सरकार हा रस्ता खुला का करत नाही, असाही सवाल त्यांनी विचारला. आंदोलकांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण हा रस्ता खुला झाला पाहिजे.