परळी : भाजपच्या नाराज नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बुधवारी मोठं विधानं केलं. माझ्या बोलण्याने भूकंप होणार अशा चर्चा होत असताना त्या म्हणाल्या की, भूकंप हा कधीच चांगला नसतो. पण उद्या गुरुवारी कुणाची हानी होणार नाही असा भूकंप करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा पंकजा मुंडेंच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी 12 डिसेंबरला पुढच्या वाटचालीबद्दल बोलणार आहे असं सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आज आपलं मौन सोडलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी बोलणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मौन स्वीकारलं होतं. त्या नाराज असल्याचं सांगत त्या भाजप सोडण्याचा विचार करताहेत अशीही चर्चा झाली.
उद्या (12 डिसेंबरला) गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्या परळीत आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अनेक प्रश्नांना मोकळी आणि रोखठोक उत्तरं दिली. माझ्या बोलण्याने भूकंप होणार अशा चर्चा होत असताना त्या म्हणाल्या की, भूकंप हा कधीच चांगला नसतो. पण उद्या कुणाची हानी होणार नाही असा भूकंप करणार असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलंय.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पक्ष सोडणार याची चर्चाच कशी झाली याचं मला आश्चर्य वाटतं. मी कधीही तसं म्हटलं नाही की संकेत दिले नाहीत. मी पक्षासाठी सतत झटत असते. भाजपमधले मोठे ओबीसी नेते पराभूत झाल्यामुळे काही वेगळी चर्चा सुरू झाली. हे नेते पराभूत झाले हे मात्र सत्य आहे. त्याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं.