मुंबई : भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात आहे. अपमानजनक करणा-या नेत्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. यावरशिर्षस्थ नेत्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
ब्रिटिशांची दलाली करणा-यांना हे नाटक वाटू शकतो…
हेगडेच्या वक्तव्याचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्यातून हेगडेंची बौद्धीक दिवाळखोरीच दिसून येते. ब्रिटिशांची दलाली करून स्वातंत्र्य लढ्याला विरोध करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढा नाटक वाटू शकतो. यांच्या पूर्वजांनीही ब्रिटिशांशी हात मिळवून स्वातंत्र्यलढ्याला कायम विरोधच केला, हे खरे भाजपाचे रूप आहे.’ पिढ्यान पिढ्य़ा ज्या विचारांनी महात्मा गांधींना विरोध केला, त्यांनाच आता महात्मा गांधी प्रातःस्मरणीय झाले आहेत हेही, खरे नाटक, आणि ढोंगच आहे. एकीकडे महात्मा गांधींना प्रातःस्मरणीय आहेत असे दाखवायचे आणि दुसरीकडे याच प्रवृत्ती त्यांच्याबद्दल हीनदर्जाची वक्तव्य करतात हे थोतांड आता उघड झाले आहे.
भाजपाने स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीबदद्ल बोलावे हेच मोठे नाटक…
भाजपाने स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीबदद्ल बोलावे हेच मोठे नाटक आहे. ब्रिटिश साम्राजाविरोधातील स्वातंत्र्यलढ्यात लाखो लोकांनी योगदान दिले, संपुर्ण आयुष्य स्वातंत्र्याच्या लढाईसाठी खर्ची घातले त्यावेळी हेगडे व त्यांचे पूर्वज ब्रिटीशांची गुलामगिरी करण्यात धन्यता मानत होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नाटक म्हणून त्याची अवहेलना करुन अनंतकुमार हेडगे यांनी संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचाच अपमान केलेला आहे. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्याला नाटक म्हणणे यातूनच त्यांची मानसीकता स्पष्ट होते. याआधाही याच विचारांच्या लोकांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत हीन दर्जाची विधाने केलेली आहेत.