मुस्लिम समाजानं सगळं काही विसरून पुढं जायला हवं. अयोध्येचा वाद आता संपला आहे. भारतातील मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची जास्त गरज आहे. त्यामुळंच अयोध्येत मिळणाऱ्या पाच एकर जमिनीवर शाळा उभारली जावी, अशी पटकथा लेखक, निर्माते व अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी व्यक्त केली आहे.
रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं शनिवारी निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. बॉलिवूडमधील दिग्गजांनीही यावर आपापली मते मांडली आहेत. देशातील महत्त्वाच्या विषयावर बिनधास्त मतं मांडणारे सलीम खान यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम पक्षकारांना अयोध्येतच पाच एकर जमीन देण्याचे आदेशही सरकारला दिले. देशभरात या निकालावर समाधान व्यक्त होत आहे. न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. खूप जुना विषय आता संपला आहे. या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. असंही सलीम खान म्हणाले.
मुस्लिमांनी आता आपल्या मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रीत करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नमाज तर रेल्वे आणि विमानातही पठण केलं जाऊ शकतं. पण खरी गरज शाळा आणि रुग्णालयांची आहे. त्यामुळं अयोध्येत मिळणाऱ्या जमिनीवर शाळा किंवा महाविद्यालय झाल्यास खूप चांगली गोष्ट होईल. २२ कोटी मुस्लिमांना चांगलं शिक्षण मिळाल्यास आपल्या देशातील अनेक उणीवा दूर होतील,’ असं सलीम खान म्हणाले.