मुंबई : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत कांडानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये एका महिलेला रॉकेल ओतून पेटवून देण्याची संतापजनक घटना घडली. औरंगाबादमधील जळीत कांड हे पीडित महिला आणि आरोपीच्या वैयक्तिक संबंधातून घडलंय. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज बुधवार ( ५ फेब्रुवारी ) येथे दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले, पीडित महिला आणि आरोपीचे वैयक्तिक संबंध होते आणि त्यांच्यातील वादातून ही दुर्देवी घटना घडल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे सोमवारी संतोष मोहिते या ५० वर्षीय व्यक्तिने पीडित महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते.
‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी…
ही महिला एकटीच राहते. ती सोमवारी घरी एकटीच असताना मोहिते तिच्या घरी आला. ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला. वर्ध्यानंतर ही घटना उघकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.