मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज बुधवारी (25 डिसेंबर) रोजी पहाटे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे तळेगाव खिंडीत घडली. सर्व विद्यार्थी संगमनेर येथील बी. जे. खताळ विद्यालयातील आहेत.
ही शालेय बस मुंबईवरुन संगमनेरला पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यावेळी महामार्गावर मधोमद बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटीची धडक बसली. त्यामुळे ऊसाची ट्रॉली महामार्गावर पलटली तसेच बसमधील 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गंभईररित्या जखमी झाले. हे सर्व विद्यार्थी संगमनेर येथील बी. जे. खताळ विद्यालयातील आहेत.
जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर एसटी बस महामार्गावर बंद झाल्याने तसेच ऊसाच्या मोळ्या महामार्गावर पडल्याने मुंबईवरुन पुण्याकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने धोकादायक पद्धतीने गाड्या पुण्याकडे वळविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी तळेगाव पोलीस दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.