मुंबई : शिवसेना भाजपामध्ये काडीमोड झाल्यामुळे भाजपने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र, 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावर आणू असा टि्वट भाजपचे नेते आमदार आशिष शेलार
यांनी केलं आहे.
मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्याने, भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे पुन्हा शिवसेनेचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण तुल्यबळ आहोत मात्र आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या जीवावर अभद्रता करणार नाही, असं ट्विट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत…मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही… मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @manoj_kotak @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
मुंबई महापालिकेत महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा 113 जादुई आकडा लागतो. भाजपचे 83 नगरसेवक आहेत. शिवसेनेकडे 94 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे 29, राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 तर काँग्रेस महाआघाडीतील घटक पक्ष समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक आहेत. त्यामुळे हा आकडा 138 पर्यंत जातो. त्यामुळे शिवसेनेचाच पुन्हा महापौर होईल हे निश्चित आहे. भाजपचे 83 नगरसेवक असल्यामुळे महापौरपदासाठी उमेदवार देऊनही त्याचा पराभव होईल त्यामुळे भाजपने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.
महापालिकेतील संख्याबळ
- शिवसेना – 94
- भारतीय जनता पार्टी – 84
- काँग्रेस – 30
- राष्ट्रवादी काँग्रेस – 8
- समाजवादी पार्टी – 6
- एमआयएम – 2
- मनसे – 1
- अभासे – 1