नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून (NRC) देशभरात आंदोलन सुरु आहे. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी वादात उडी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अनुपम खेर व या आंदोलनापासून दूर राहणाऱ्या बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी तसेच बुद्धिजीवी वर्गाप्रती फारच अंसेवदेनशीलता दाखवत आहेत. कदाचित विद्यार्थीदशेतून गेलेले नसल्याने ते असे वागत असावेत, असा टोला नसीरुद्दीन यांनी लगावला. ‘अनुपम खेर या मुद्द्यावर फारच पुढाकार घेताना दिसत आहे. मला विचाराल तर त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तो एक जोकर आहे. एनएसडी आणि एनएफटीआयआयच्या काळापासूनच तो तसा आहे. अनुपम एकप्रकारचा मनोरुग्ण आहे हे त्याच्या समकालीन सर्वच सहकाऱ्यांना माहीत आहे. हा गुण त्याच्या रक्तातच आहे’, अशी तोफ नसीर यांनी डागली.
जनाब नसीरुदिन शाह साब के लिए मेरा प्यार भरा पैग़ाम!!! वो मुझसे बड़े है। उम्र में भी और तजुर्बे में भी। मै हमेशा से उनकी कला की इज़्ज़त करता आया हूँ और करता रहूँगा। पर कभी कभी कुछ बातों का दो टूक जवाब देना बहुत ज़रूरी होता। ये है मेरा जवाब। 🙏 pic.twitter.com/M4vb8RjGjj
— Anupam Kher (@AnupamPKher) January 22, 2020
जे लोक या कायद्याचे समर्थन करत आहेत त्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आपण कशाचे समर्थन करत आहोत, याचे भान राखले पाहिजे, असे सांगतानाच आम्हाला आमची जबाबदारी काय, हे कुणी सांगण्याची गरज नाही. ती आम्हाला चांगली ठाऊक आहे, असे नसीर यांनी टीकाकारांना सुनावले.
चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक व कलाकार या कायद्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. सुपरस्टार्स मात्र यावर मौन बाळगून आहेत. मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. आपण विरोध केल्यास आपल्याला बरेच काही गमवावे लागेल, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असेल. मला या सर्वांत कौतुक वाटते ते दीपिकाचे. खरंतर तिने कशाचीही तमा न बाळगता विद्यार्थ्यांची साथ दिली. विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरुद्ध ती उभी ठाकली’, अशा शब्दांत नसीर यांनी दीपिकाची स्तुती केली.
‘भारतात ७० वर्षे राहिल्यानंतरही मी या देशाचा नागरिक आहे हे सिद्ध होऊ शकत नसेल तर दुसऱ्या कोणत्या पुराव्याने ते सिद्ध होणार, हा माझ्यापुढचा खरा प्रश्न आहे. सध्याच्या स्थितीबाबत मला विचाराल तर मी कोणालाही घाबरत नाही आणि मी अस्वस्थही नाही फक्त मला प्रचंड चीड आली आहे’, अशा शब्दांत नसीर यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.