मुंबई : मुंबईमध्ये आज नागरिकांनी सुधारित नागरिकत्व कायदा ( CAA ) विरोधात जोरदार आंदोलन केले. ऑगस्ट क्रांती मैदानात विविध संघटनांच्या लोकांनी एकत्र येऊन या कायद्याचा विरोध केला. केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच दक्षिण मुंबईत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
या आंदोलनात काँग्रेस नेते राज बब्बर, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई, सुधींद्र कुलकर्णी,अभिनेते सुशांतसिंह राजपूत, फरहान अख्तर, यांच्यासह हजारो नागरिक, विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी, तरुण, तरूणी उपस्थित होते.
सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन केलं जात आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. या कायद्याविरोधात आज ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. मुंबईत होणा-या आंदोलनात अठराहून अधिक विद्यार्थी संघटना एकत्र येऊन मोदी सरकार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला होता. सध्या देशभरात या कायद्याविरोधात जाळपोळ, निदर्शने, धरणे, बंद, या प्रकारचे आंदोलन करुन कायद्याचा विरोध होत आहे. निवेदन सादर करुन कायदा मागे घेण्याची मागणी केली जात आहे. यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
विविध शहरांमध्ये आंदोलन सुरु आहेत. दिल्ली, कोलकत्ता, पश्चिम बंगाल, मुंबई, पुणे, औरंगाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. त्यापाठोपाठ सर्वत्र आंदोलन सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे
यापूर्वी रेणुका शहाणे, हुमा खुरेशी, स्वरा भास्कर यांच्यासह फरहान अख्तर, सिद्धार्थ, अनुभव सिन्हा, विकी कौशल, पूजा भट्ट, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, अनेक कलाकारांनी नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका मांडली आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील काही विद्यार्थांनी सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिम विरोधी आहे, असं म्हणत आंदोलन केले होतं. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याविरोधात देखील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त करत ट्विट केले होतं. कायद्याविरोधात सर्वत्र भडका उडाल्यामुळे देशात अशांतता पसरली आहे. मात्र, आज मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली.